देश विदेश

“सरकार येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका”, धारावी मुद्द्यावरून ठाकरेंचं पोलिसांना आवाहन; म्हणाले, “गुंडागर्दी झाली तर…”

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदाणी समूहाकडे गेल्याने त्याविरोधात ठाकरे गटाने धारावी ते बीकेसी असा मोर्चा काढला. या मोर्चा खुद्ध ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. अदाणी समूहाला दिलेल्या या प्रकल्पाविरोधात आवाज उठवताना ठाकरेंनी पोलिसांनाही धारावीकरांच्या बाजूने उभे राहण्याचं आवाहन केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. जिथल्या तिथं घर हवं. पात्र अपात्र आम्ही मानत नाही. व्यवसायासाठी जागा द्या, कोळीवाडा-कुंभारवाड्यांचं सीमांकन द्या. लोणची पापड सारख्या व्यवसायाला खुल्या जागा द्या.”

पुढे ते म्हणाले, “मी असं ऐकलंय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे. मी त्यांनाही सांगतो की, सरकार येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका. नोंद तुमच्याकडेही होते आणि जनतेकडेही होते. सरकार कधीही येतं आणि कधीही जातं. पण तुमच्या सदरक्षणाय खलनिग्रहणायला सोडू नका.”

“काही निवृत्त पोलीस आणि त्यांचे गुंड इथे सोडलेले आहे. गुंडागर्दी झाली तर तिथल्या तिथे ठेचा. तुमच्यासोबत पोलीस नाही आले तर मी तुमच्यासोबत येईन”, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

५० खोके कमी पडायला लागले म्हणून…

उद्धव ठाकरे म्हणाले, “अदाणींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींची नाव घेणार नाही. ५० खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत. यांची मस्त वाढत चालली आहे. एकतर हे असंवैधानिक सरकार आहे.”

हे सरकार अदाणींच्या दारी आहे

“वर्षा गायकवाड यांनी अदाणींना प्रश्न विचारला, तर भाजपा उत्तर देते. नशिब समजा तुमची अजून महुआ मोईत्रा करण्यात आली नाही. महुआ मोईत्रांनी त्यांना ( अदाणींना ) प्रश्न विचारल्यावर निलंबित करण्यात आलं. नशिब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहात. ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम चालू होता. पण, हे ‘सरकार अदाणींच्या दारी’ आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button