क्राईम

मृतदेहाला वालीच नाही, रेल्वेखाली सापडून मरण पावलेल्या तरुणाचे मृत्यूनंतरही हाल

परभणी : गंगाखेड स्थानकावर आज मोठी घटना घडली. नितीन रामभाऊ उदगीरे या तरुणाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. राज्य शासनाचे रेल्वे पोलीस या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे तब्बल दोन तास त्याचा मृतदेह रेल्वे स्थानकावर पडून होता. परिणामी मृतदेहाची अवहेलना झाली. यामुळे गंगाखेड स्थानकावर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक का करण्यात आली नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील करम येथील रहिवासी नितीन रामभाऊ उदगिरे अंदाजे (वय ३५ वर्षे) हा सकाळी १० वाजून ४० मिनिटांच्या सुमारास गंगाखेड रेल्वे स्थानकाजवळ आला आणि तो अचानक गाडीखाली सापडला. हा प्रकार रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या कोणाच्याही लक्षात आला नाही. त्यामुळे आदिलाबादवरून परळीकडे जाणारी गाडी गंगाखेड रेल्वे स्थानकावरून रवाना करण्यात आली. त्यामुळे गाडीखाली असलेल्या नितीन याचा मृत्यू झाला.

हा प्रकार या ठिकाणी उपस्थित असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नितीनच्या मृतदेहाकडे धाव घेतली. पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी रेल्वे पोलीस कर्मचारी असणे आवश्यक होते. मात्र गंगाखेड येथील चौकीमध्ये एकही कर्मचारी नसल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती परळी येथील रेल्वे स्थानकावरील पोलीस स्टेशनला दिली.

परळी रेल्वे पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर तब्बल दोन तासाने पोलीस कर्मचारी गंगाखेड रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच नितीनच्या नातेवाईकांनी गंगाखेड रेल्वे स्थानकावर धाव घेतली. दोन मुलाच्या बापाचा असा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलीस कर्मचारी नसल्यामुळे दोन तास मृतदेहाची अवहेलना झाली आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक का नाही?

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात गाड्या जात असल्याने प्रवासी संख्याही मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे स्थानका अंतर्गत एक रेल्वे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या पोलीस चौकीमध्ये आज एकही पोलीस कर्मचारी नसल्याने नितीनचा मृतदेह दोन तास रेल्वे स्थानकावर ठेवण्याची वेळ आली. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती असेल तर तो हजर का नव्हता? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. तर परळीहून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणचे कर्मचारी कुठे गेले आहेत? अशी विचारणा केली असता ते छत्रपती संभाजीनगर येथे न्यायालयात गेले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button