राजकारण

राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला चॅलेंज द्यावं; ठणकावून सांगावं, मी निर्णय देणार नाही: प्रकाश आंबेडकर

मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या तब्बल महिनाभराच्या सुनावणीनंतर आता निकालाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, अद्याप विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय सुनावलेला नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राहुल नार्वेकर यांना एक वेगळाच सल्ला दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाला आव्हान द्यावे. मी निर्णय देणार नाही, तुम्हाला करायचय ते करा, असे विधानसभाध्यक्षांनी स्पष्टपणे न्यायालयाला सांगावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बाजू उचलून धरली. माझं राहुल नार्वेकर यांना हेच सांगणं आहे की, विधानसभा अध्यक्षाचे पद सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित येत नाही. मी निर्णय देत नाही, काय करायचं ते करा, असे नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला सांगावे. कायद्याचे राज्य चालले पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेचा निर्णय देत नाहीत, ही गोष्टीही चूक आहे. परंतु, राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित येत नाहीत. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना आपल्या कक्षेत घेऊ इच्छित आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांनी, ‘ मी निर्णय देणार नाही. मला द्यायचा असेल तेव्हा निर्णय देईन’, असे ठणकावून सांगावे. सर्वोच्च न्यायालय या माध्यमातून विधानसभा अध्यक्षाला एक सामान्य माणूस करु पाहत आहे. हा संवैधानिक मार्ग नाही. यापूर्वी सर्वोच्च न्यायालायने लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांना नोटीस पाठवली होती. तेव्हा सोमनाथ चॅटर्जी यांनी सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या विरोधात उलट समन्स काढलं होतं. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानेही आपली चूक मान्य केली होती. आम्ही लोकसभा अध्यक्षाला नोटीस पाठवू शकत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते. सोमनाथ चटर्जी हे लोकसभा अध्यक्ष होते, तर राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दोघांचेही अधिकार समान आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना सोमनाथ चॅटर्जी होण्याची संधी आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला मी आमदार अपात्रतेचा निर्णय घेणार नाही, हे सांगावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करण्यासाठी गरीब कुटुंबाना एक-एक हजार द्या: प्रकाश आंबेडकर

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. आम्ही २२ तारखेला दिवाळी साजरी करायला तयार आहोत, पण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दिवाळी साजरी करण्यासाठी एक- एक हजार रुपये द्यावेत, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button