राजकारण

काँग्रेस-वंचितमधील वैरत्व दूर होणार?

अकोला : संविधान सन्मान महासभा घेऊन वंचित बहुजन आघाडीने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या सभेच्या माध्यमातून काँग्रेस व वंचितमध्ये जवळीक वाढली आहे. दोन्ही पक्षांमध्ये संवाद सुरू झाला. त्यामुळे गेल्या चार लोकसभा निवडणुकीतील वैरत्व विसरून आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस व वंचित एकत्र येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आघाडीवरून चांगलाच काथ्याकूट होत असल्याचे चित्र आहे. ‘वंचित’ इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्यास अकोल्यासह लोकसभेच्या राज्यातील अनेक जागांवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडी देखील पूर्ण क्षमतेने तयारीला लागली. राज्याच्या राजधानीत संविधान सन्मान महासभा घेऊन ॲड. प्रकाश आंबेडकरांनी आपला प्रभाव दाखवून दिला. विशेष म्हणजे या सभेसाठी त्यांनी थेट काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवले. राहुल गांधींनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवत वंचित आघाडीच्या कार्याचे कौतुक केले. शिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सभेत सहभागी झाले. चर्चेसाठी देखील काँग्रेसच्या नेत्यांनी ॲड. आंबेडकरांनी भेट घेतली. आघाडी करण्यावरून दोन्ही बाजूने सकारात्मकता दिसून येत आहे.

भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची चर्चा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत होत असते. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी केली होती. त्यावेळी अकोला मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर सलग दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००४, २००९, २०१४ व २०१९ च्या सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढले. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीवरून चर्चेचे सत्र चालते. वारंवार काँग्रेस पक्षाकडे प्रस्ताव देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे, तर काँग्रेस नेतेही आघाडीसाठी सकारात्मक असल्याचे वारंवार सांगतात, मात्र प्रत्यक्षात कृती होत नव्हती. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. तडजोड होत नसल्याने अखेरच्या क्षणी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरतात, हा गेल्या चार निडणुकीतील इतिहास आहे. त्यामुळे राज्यात मतविभाजन होऊन काँग्रेस व वंचितचे नुकसान होते, तर भाजपला त्याचा थेट फायदा होता. काँग्रेस व वंचितमध्ये पाडापाडीचे राजकारणात देखील होते. याचा प्रत्यय अकोला मतदारसंघात सातत्याने आला आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचितमध्ये आघाडीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना १ सप्टेंबरला लेखी प्रस्ताव पाठवूनही त्यांच्याकडून कुठलेही उत्तर आले नसल्याचे सांगत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर राज्यातील ४८ जागांवर तयारी सुरू केली. अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोंडीत पकडले. वंचितने आघाडीचे पत्र पाठवून देखील काँग्रेसकडून इन्कार करण्यात येत होता. संविधान सन्मान सभेच्या निमित्ताने ॲड. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना निमंत्रण दिल्याने दोन्ही बाजूने सुसंवादाला नव्याने प्रारंभ झाला. राज्यातील राजकारणाची दिशा बदलवणारी ही घडामोड ठरू शकते. दोन्ही बाजूने येणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे वंचित व काँग्रेस एकत्र येण्याची आशा कार्यकर्त्यांमध्ये पल्लवित झाली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button