काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जून खर्गे यांना व यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी
नांदेड, दि. 9 ः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खर्गे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकमधील चित्तपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मनिकांत राठोड यांनी दिली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने एका निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी असे म्हंटले आहे की, कर्नाटकमध्ये सध्या निवडणूका सुरू आहेत. या निवडणूकीदरम्यान भाजप उमेदवार मनिकांत राठोड यांनी खा.मल्लिकार्जून खर्गे व त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. मनिकांत राठोड यांच्यावर या पूर्वीही अनेक गंभीर गुन्हे नोंदविले गेले आहेत. त्यांनी दिलेल्या धमकीचा सबळ पुरावा सोबतच सोडला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मनिकांत राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे, परंतु अद्याप अशा प्रकारची कोणतीही कारवाई कर्नाटक सरकारकडून करण्यात आली नाही. काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला धमकी दिल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कर्नाटकचे मुख्यमंत्री एस.आर. बोम्मई यांनी बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा निषेध करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या नावाने दिलेले निवेदन अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वीकारले. अविनाश कुमार यांना भेटलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, काँग्रेसचे नांदेड तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, मागासवर्गीय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे यांचा समावेश होता.
शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा
अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या भेटी दरम्यान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहरातील विविध विषयांसंदर्भात चर्चा केली. विशेषतः नांदेड शहरात जटील बनलेल्या वाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावी, या संदर्भात ठोस पाऊले उचलावेत असे सुचविले. त्या सोबतच शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अवैध रेती चोरी या बाबींकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. शिष्टमंडळाच्या सर्व सूचनांना अविनाश कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.